पुणे : ‘जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणाचे निमित्त साधत एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे,’ असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि सह्य़ाद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्यावतीने संस्थेच्या ११० एकर जागेत किमान एक लाख वृक्ष लावण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी या वेळी सांगितले.
या ठिकाणी आंबा, चिंच, आवळा, पेरू आदी देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात देशी वृक्षांची देवराई साकारत आहे. या वेळी व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, महेश नामपूरकर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. सतीश देशमुख, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रीती सांगवान आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक सचिन कुदळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सयाजी शिंदे यांनी कवी अरविंद जगताप यांची झाडांचे महत्त्व सांगणारी कविता सर्वांकडून म्हणवून घेतली.